इथं दुसरा कुठलाही विषय नाही; मराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे घराणे एकत्र : खासदार संभाजीराजे छत्रपती

पुणे :
ज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षीत असलेली खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट झाली. या भेटीनंतर पत्रकारांशी चर्चा करताना आम्ही दोघे एकाच घराण्याचे आहोत, त्यामुळे इथं दुसरा कुठलंही विषय येत नाही. मराठा आरक्षणासाठी दोन्ही घराणे एकत्र आली आहे, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया संभाजीराजे आणि उदयनराजेंनी दिली.
पुण्यातील औंध बॅनर रोडवर असलेल्या उदयनराजे भोसले यांच्या मित्राच्या घरी ही भेट झाली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. आज बऱ्याच वर्षांनंतर आम्ही दोघे भेटलो. सातारा आणि कोल्हापूर घराणे मराठा समाजाच्या मुद्यावर एकत्र आले आहे. या भेटीमुळे मनापासून आनंद झाला आहे. उदयनराजे यांनी परवाच भेट घेण्यासाठी बोलावले होते, पण काही कारणास्तव ती भेट होऊ शकली नाही. पण आजही भेट झाली असून आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.
तसंच, आम्ही सरकारसमोर सहा मागण्या केल्या आहेत, समाज बोलला आहे, आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधी सुद्धा बोलले पाहिजे. आमच्या सहा मागण्या लवकरात लवकर मान्य करा, त्यावर तोडगा काढावा. तसंच, ‘अजित पवार हे छत्रपती शाहू यांचा आशिर्वाद घेण्यासाठी कोल्हापूरला गेले असतील. ते भेटायला जातील याबद्दलची माहिती माझ्याकडे नव्हती. जर या भेटीतून काही तोडगा निघत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. मला व्यक्तिगत कल्पना नव्हती. पण पॅलेसमधून मला फोन आला होता. अजितदादांचा मला कोणताही फोन आला नाही’ असंही संभाजीराजेंनी सांगितलं.
‘आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. त्यामुळे इथं दोन घराण्याचा संबंध येत नाही. संभाजीराजे यांनी जे विचार मांडले त्याचाशी मी सहमत आहे. मला सर्वांना सांगावसं वाटतं, आम्ही दोघं एकाच घराण्याचे आहोत. संभाजीराजे वंशज राजाराम महाराजांचे, वडील एकच… त्यामुळे दोन घराण्यांचा संबंध नाही, आम्ही एकच आहोत. संभाजीराजेंनी टेक्निकल मुद्दे मांडले. प्रत्येकाने ठरवायचं आहे. २३ मार्चला जीआर काढून आरक्षण दिलं जात आहे. मग मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्या. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दुफळी निर्माण केली जात आहे’ असा आरोपही उदयनराजे यांनी केला.
व्यक्तिगत स्वार्थासाठी समाजामध्ये दुफळी निर्माण होईल, आम्ही कोणतेही कृत्य कधी केले नाही. कोर्टात काय होईल, काय निर्णय येईल, याकडेच यांचं लक्ष आहे. यांना समाजाशी काही घेणे देणे नाही. व्यक्ती केंद्रीत राजकारणी झाले आहे. देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? देशाची फाळणी करण्याच्या दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत असा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे. हे राज्याच्या बाबतीत आणि केंद्राबाबतीतही लागू आहे. आज यामुळे मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला तर याला सरकारच जबाबदार राहणार आहे.उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार ते असतील. त्यावेळी ना उदयनराजे, ना संभाजीराजे हा उद्रेक थांबवू शकणार नाहीत. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, आम्हाला बाजूला केलं जाईल..अशी वेळ येऊ देऊ नका, पण ती येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.