लॉकडाउनसंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान ; म्हणाले…

टीम ऑनलाईन :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून सर्वसामान्यांना पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे. राज्यावर पुन्हा एकदा करोना संकट निर्माण झाल्याने लॉकडाउनबाबत चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे लोकांनी नियम पाळले नाही तर लॉकडाउन केला जाईल असा इशारा दिला आहे. त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
“मला असं वाटतं की, मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाउनचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा तसंच इतर परिणामांचा विचार करुन ते आणि इतर वरिष्ठ मंडळी चर्चा करतील आणि ठरवतील. लॉकडाउन हा खरं तर शेवटचाच पर्याय असतो त्यामुळे याबबत सविस्तर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी मुंबई लोकलसंबंधीही भाष्य केलं. लोकलबाबत कठोर निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ते म्हणाले की, “सुरेश काकाणी यांनी चर्चा करुन पत्र काढलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य ते विचार करावा लागेल असं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतील”.