कोविड -१९ची साथ सुरु झाल्यापासून महाराष्ट्र राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका; राज्याला पुरेशी लस मिळत नसेल तर पर्याय तरी काय उरतो? : राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

मुंबई :
राज्यात १०० टक्के कोरोना लसीकरण करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. त्य़ांनी आपल्या पत्रात म्हटलंय आहे की, ‘गेल्यावर्षी कोविड -१९ची साथ सुरु झाल्यापासून महाराष्ट्र राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळत होते. तेव्हापासूनचं महाराष्ट्रात, निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यूदेखील झाले आहेत. आज सारा देश कोविड -१९ च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट आहे.
कोविड -१९ ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातचं देशभरही पडलेले आपण अजुनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण, जर राज्याला पुरेशा लसी मिळतचं नसतील तर पर्याय तरी काय उरतो?
या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची व कळीची आहे. म्हणूनचं, महाराष्ट्राला १०० लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून राज्यातला सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय.
हे उद्दिष्ट सध्य करण्यासाठी, विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ तर हवीचं.
म्हणूनचं केंद्राकडे माझी मागणी आहे की –
– महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या.
– राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.
– सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण, योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
– लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातील इतर संस्थांना (उदा. हॉफकिन व हिंदुस्तान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.
– कोविड १९ चा रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसीवीर, ऑक्सजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.
या कोविड १९ च्या साथीमुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्य़ेक राज्याला तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार, धोरण आखण्याची गरज आहे.
आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवनगीचं नाही तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपायोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, ज्यातून एकमेकांना शिकण्याची संधी मिळेल.