इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भारतासमोर सर्वोत्तम कामगिरीचं आव्हान

टीम ऑनलाईन :
जागतिक क्रमवारीत आघाडीच्या दोन संघांत समावेश असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यात आज एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला जात आहे. पुण्याच्या गहुंजे मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात पुन्हा एकदा इंग्लडच्या जोस बटलरने नाणेफेक जिंकली आहे. इंंग्लंडचा संघ प्रथम गोलंदाजी करून भारताच्या आव्हानाचा पाठलाग करणार आहे.
आज दोन्ही कर्णधारांनी आपल्या ताफ्यात बदल केला आहे. इंग्लंडने टॉम करनला बसवून मार्क वूडला संघात आणले आहे. तर, विराटने दुसऱ्या सामन्यात महागड्या ठरलेल्या कुलदीप यादवला बसवून यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनला संधी दिली आहे.
दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 336 धावांचे विशाल आव्हान ठेवले होते. मात्र, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स आणि जेसन रॉय यांच्या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडने हे आव्हान सहा गडी राखून आरामात पूर्ण केले. या सामन्यात भारताचे गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. त्यामुळे आज टीम इंडिया सर्व कमकुवत बाजू सुधारून मालिकाविजयाची धुळवड साजरी करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.