मोठी बातमी : ठाकरे सरकारचं राज्यातील जनेतला गिफ्ट, कोरोना निर्बंध हटवले ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई ऑनलाईन :
महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे गुढीपाडवा सणादिवशी शोभायात्रांमध्ये कसली आडकाठी येणार नसून धुमधडाक्यात हा सण साजरा करता येणार आहे. तसेच रमजानला मिरवणुका काढण्याचे मुभा देण्यात आली आहे. ज्यांना मास्क वापरायचे आहेत त्यांनी वापरावे, तर ज्यांना वापरायचा नाही त्यांनी वापरू नये. याचाच अर्थ मास्क हा ऐच्छिक असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. गुढी पाडव्याच्या मिरवणुका जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणुका जोरात काढा असं ट्विट करत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने मंजूर झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्य अनलॉक झालं आहे. कोणतेही निर्बंध आता राज्यात असणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोना काळात जे निर्बंध लावण्यात आले होते ते हटवण्यात आले आहेत. ७३६ दिवसांनंतर महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. इथे महाराष्ट्र मास्क मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी मास्क वापरणे ऐच्छिक आहे, असे त्यांनी सांगितले.