ताज्या बातम्यामहाराष्ट्र
#Maharashtra_Lockdown : राज्यात लॉकडाऊनची शक्यता वाढल्याने मजुरांनी धरली गावची वाट, गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ

मुंबई :
राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी केली जात असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकोत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून दररोज लांब पल्ल्याच्या 20 गाड्या चालविण्यात येतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पटणाकरिता धावतात. यामध्ये मजुरांची संख्या मोठ्या आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल तर कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. राज्यात काल तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. काल नवीन 24 हजार 126 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2457494 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 389832 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे.