झिरो रूग्ण मोहिमेसाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून तब्बल 41 दिवसानंतर थोडेसे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू कमी होते. सध्या 40 लाख लोकसंख्येच्या कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 13 हजार 257 इतके सक्रीय रूग्ण आहेत. मात्र ही संख्या आशादायक नाही. प्रशासनाच्या ‘झिरो पेंन्डसी’च्या धर्तीवर ‘झिरो रूग्ण’ ही संकल्पना घेवून प्रशासन कार्यरत आहे.
आतापर्यत लॉकडाऊनमध्ये कोल्हापूरकरांनी जसा सयंम बाळगला तसा यापुढेही बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांच्या प्रतिसादाशिवाय हे शिवधनुष्य पेलणे शक्य नाही. तेव्हा सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून वागावे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढवल्याने रूग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र दिसत असले तरी नागरिकांनी घाबरू नये, तसेच या ठिकाणी ॲडमीट होणारे बरेचसे रूग्ण हे लगतच्या जिल्ह्यातील असल्याने रूग्णसंख्या वाढल्याचे दिसते. नागरिकांनी कोरोनबाबत लक्षणे दिसताच वेळीच उपचार घ्यावेत. तपासणी आणि उपचारास विलंब करू नये. त्याचबरोबर दुखणे अंगावर काढू नये. आवश्यकता असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडावे अन्यथा पडू नये. कोरोनाचे स्प्रेडर होऊ नये. एकत्रित गर्दी करू नये. जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
म्युकर मायकोसिसचाही मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून त्यासाठी सी.पी.आर.रूग्णालयासह इतर रूग्णालयातही या आजाराच्या रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यातील नेत्र रोग तज्ज्ञांना माझे आवाहन आहे की, त्यांनी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती, प्रबोधन करावे. ‘कोल्हापूरवासिय’ लढवय्ये आहेत. त्यांनी या सर्व लढ्यात प्रशासनाला साथ द्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.