रांगणा किल्ल्यावरील दरीत पडलेली तोफ गडावर आणण्यात यश, त्रिवेणी ग्रुपच्या तरुणांचे प्रयत्न आले फळास

प्रतिनिधी
घनदाट जंगल,वन्यप्राण्यांचा वावर, रस्त्यांचा अभाव, दरीत उतरण्यासाठी फक्त पायवाट, केवळ हाताने चेन ब्लॉकने ओढण्याशिवाय अन्य पर्याय नाही अशा खडतर परिस्थितीतून मार्ग काढत ऐतिहासिक रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे ३५०० फूट खोल दरीत पडलेली शिवकालीन तोफ गडावर आणण्यात यश मिळाले.
भुदरगड तालुक्यातील रांगणा ऊर्फ प्रसिद्ध गडाच्या पायथ्याशी दाट जंगलात सुमारे ३५०० फूट खोल दरीत पडलेली ही तोफ अंदाजे अडीच टन वजनाची आहे. ही तोफ बोरवडे ( ता.कागल ) येथील त्रिवेणी ग्रुपच्या तरुणांनी अथक प्रयत्नाने दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. इसवी सन १८४४ च्या सुमारास गडकऱ्यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील तोफा दरीत ढकलल्या होत्या. आता अनेक वर्षांनंतर या तोफा शोधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.
या गडाच्या पायथ्याशी अशी एक तोफ असल्याची माहिती बोरवडे ( ता. कागल ) येथील त्रिवेणी ग्रुपच्या तरुणांना समजली. त्यांनी ही तोफ दरीतून गडावर आणण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष गडावर भेट देऊन आवश्यक साहित्याची जमवाजमव केली. चालू वर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून ग्रुपच्या सदस्यांनी गडाच्या पायथ्याशी दाट जंगलात सुमारे ३५०० फूट दरीत उतरुन ही तोफ बाहेर काढण्यास प्रारंभ केला.मोठमोठाले दगडगोटे आणि झाडेझुडपे पार करत ते तोफेपर्यंत पोहचले. त्यानंतर गेली दोन महिने या तरुणांनी अथक परिश्रम करित अखेर ही तोफ गडावर आणण्यात यश मिळविले आहे.
तोफ वर काढत असताना क्षणोक्षणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि जय शिवाजीच्या घोषात अगदी उत्साहात तोफ वर खेचण्याचे काम एकसारखे सुरु होते.दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर गडावर तोफ आल्यावर शिवरायांचा जयघोष करित या तरुणांनी आनंद व्यक्त केला. या तोफेची लांबी साधारण दहा फुटांच्या आसपास आहे. मागील घेर साडेचारफूट आणि पुढील अडीच फुटांचा आहे. वजन अंदाजे अडीच टनाच्या आसपास आहे.
या मोहिमेत १३ कायमस्वरुपी तर १५ ते २० युवकांनी तात्पुरती मदत केली. यामध्ये सुनील वारके, जीवन फराकटे, बाजीराव खापरे ( मडीलगे खुर्द ),प्रविण पाटील ( बिद्री ), शरद फराकटे , नेताजी साठे ,चंद्रकांत वारके ,राहुल मगदूम, सुनील फराकटे मेजर, निखिल परीट,अमर सातपुते, अरुण मगदूम, रघुनाथ वारके ( कासारवाडा ) , प्रज्योत चव्हाण, नेताजी सुर्यवंशी,अवधूत पाटिल ( खानापूर ), तानाजी साठे, भाऊ साठे, बजरंग मांडवकर ( वाळवे खुर्द ), अवधूत शिंगे, प्रथमेश पाटील यांनी सहभाग घेतला
नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता या तोफेचा शोध घेणे एक आव्हान होते. मात्र, घनदाट जंगल आणि शेकडो किलो वजनाची ही तोफ वर आणणे अशक्यप्राय गोष्ट. यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले होते.त्रिवेणी ग्रुपच्या सदस्यांनी रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी दरीत उतरत तोफेचा शोध सुरु केला आणि दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर तोफ गडावर आणण्यात या तरुणांना यश आले. दरीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्यांनी पाठीला पाण्याच्या बॉटल बांधून ते दरीत उतरले होते. या यशस्वी मोहिमेनंतर त्रिवेणी गुपच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी तोफ असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोरवडेतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते महादेव फराकटे ( भाऊ ) यांनी गावातील तरुणांना एकत्र करुन या मोहिमेची आखणी केली. श्री. फराकटे हे त्रिवेणी कन्स्ट्रक्शनचे मालक असून आपला उद्योगातील व्याप सांभाळून त्यांनी या मोहिमेसाठी आवश्यक ती सर्वोत्तोपरी मदत केली. सामाजिक बांधिलकी जपत महादेव फराकटे ( भाऊ ) यांनी केलेली ही मदत कौतुकास्पद असल्याची भावना सहभागी युवकांनी व्यक्त केले.