कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : टोकाच्या राजकीय ईर्ष्येमुळे मतदारांच्या ‘अपेक्षा’ वाढल्या !

कोल्हापूर प्रतिनिधी :
तुल्यबळ वाटणार्या लढतीमुळे विधान परिषद निवडणुकीत ‘मोठी’ संधी चालून आल्याने मतदारांच्या अपेक्षा वाढतच आहेत. एका विशिष्ट उंचीवर ‘अर्थ’पूर्ण चर्चा पोहोचल्या आहेत; पण प्रत्यक्षात ‘मदती’चा आकडा मतदारांना कमी वाटत असल्याने ‘डिमांड’ व ‘ऑफर’ यांचा मेळ बसेना, असे काहीसे वातावरण राजकीय क्षेत्रात आहे.
त्यामुळे ‘विषय’ संपल्याशिवाय दिला शब्द खरा करण्याची मानसिकता मतदारांची नसल्याने मनधरणी करताना दोन्हींकडील शिलेदारांची मात्र दमछाक होत आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात लढत चुरशीची होणार नसल्याचे काहीसे वातावरण होते. त्यामुळे मतदारांत अस्वस्थता होती. निवडणुकीला रंग आणण्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या. शेवटी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक हे दोन पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धक रिंगणात उतरल्याने मतदारांना हायसे वाटले.
टोकाच्या राजकीय ईर्ष्येमुळे उमेदवारांनी खोक्यात खर्च करण्याची तयारी ठेवली आहे. तर मतदारकिमान पंधरा ते वीस पेट्या मिळतील, अशी अपेक्षा बाळगून आहेत. काही मतदारांनी दुप्पट पेटीची अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पण ‘ऑफर’ इतकी नाहीये, अशी समजूत दोन्ही बाजूंची यंत्रणा काढत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने अपेक्षांचा कळस गाठल्याची चर्चा मात्र रंगली आहे.