“….तर तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं,” राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती

मुंबई प्रतिनिधी :
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हि.डी.ओ. कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी लसीकरण, ऑक्सिजन तसंच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्या.
मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली. “प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं. आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ.
पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावं लागत आहेत.
लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नाही असं सांगण्याची वेळ आली आहे.
या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे,” अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
“लसीकरण करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. जर एखादा रामबाण उपाय असेल तर आपल्यामध्ये प्रतिकारश्की निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लसीकरण महत्वाचा मार्ग आहे. लसीकरण मोफत आणि सुरक्षित आहे.
पण लस मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे मी पोटतिकडीने विनंती केली आहे. खासकरुन कोव्हॅक्सिन द्या अशी मागणी केली आहे.
का देऊ नये हा भागही आग्रहपूर्वक मांडला. लस दिली तर मोठा प्रश्न सुटेल,” असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला.