बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी

पुणे :
राज्यात आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतीक्षा होती, ही प्रतीक्षा संपली.
राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 97.22 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (90.91 टक्के) आहे.
विभागनिहाय निकाल
🔅कोकण – 97.22 टक्के
🔅पुणे – 93.61 टक्के
🔅कोल्हापूर – 95.07 टक्के
🔅अमरावती – 96.34 टक्के
🔅नागपूर – 96.52 टक्के
🔅लातूर – 95. 25 टक्के
🔅मुंबई – 90.91 टक्के
🔅नाशिक – 95.03 टक्के
🔅औरंगाबाद – 94.97 टक्के
यंदाही मुलींचीच बाजी
बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.