शालेय शुल्क तपासणी पथक 48 तासात नेमा; अन्यथा घंटानाद; ‘आप’ने दिला निर्वाणीचा इशारा

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांची ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे शाळांचे शिकवणी व्यतिरिक्त इतर खर्च कमी झाले आहेत. काही शाळा पालकांकडून अवाजवी शालेय शुल्काची मागणी करत आहे. अशाप्रकारच्या वसुलीला आळा घालण्यासाठी शालेय शुल्क तपासणी टास्कफोर्स नेमावा अशी मागणी आम आदमी पार्टीने शिक्षण उपसंचालकांकडे केली होती. याला प्रतिसाद देत त्यांनी शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्याचे आदेश आपल्याला 8 जुलै, 2021 रोजी दिले होते. परंतु यावर अजून कार्यवाही झालेली नसल्याने आम आदमी पार्टीने शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी भेट घेऊन जाब विचारला.
शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी करत येत्या 48 तासाच्या आत शालेय शुल्क तपासणी पथक नेमले जावे. या पथकाने पुढील 4 दिवसात आपली तपासणी पूर्ण करून आपल्याकडे अहवाल सादर करावा. अन्यथा पालकांना सोबत घेऊन आम आदमी पार्टी आपल्या कार्यालयासमोर घंटानाद करेल असा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी शिक्षणाधिकारी लोहार यांना दिला.
शालेय शुल्क तपासणी पथकाने सादर केलेल्या अहवालात ज्या शाळा नियमबाह्य शालेय शुल्क वसूल करत आहेत त्यांना ती वसुली थांबण्याचे लिखित आदेश व्हावेत. ज्या शाळांनी असे शुल्क वसूल केले आहे ते पालकांना परत देण्यात यावे. वारंवार इशारा देऊन देखील शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत बेकायदेशीर शालेय शुल्क वसूल करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव आपल्याकडून मा. शिक्षण उपसंचालकांना सादर व्हावा. कोणत्याही कारणामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून बाहेर काढू न नये, त्यांची लिंक बंद करू नये असे आदेश मा. शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. तरी देखील काही शाळा विद्यार्थ्यांना लिंक पाठवत नाही आहेत. तात्पुरते तोंडी आदेश न देता अशा शाळांना त्वरित कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करावी.
आर. टी. ई. कायद्यानुसार आरक्षित असणाऱ्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. परंतु यावर्षी राज्य शासनाने आर टी ई प्रतिपूर्ती रक्कम 8 हजार रुपये प्रति विद्यार्थी निश्चित केल्याने प्रवेश देणाऱ्या शाळा वरील फरक पालकांकडे मागणी करत आहेत. जे पालक वरील फरक भरू शकत नाहीत त्यांना शाळा सोडण्यास सांगितले जात आहे. ही मागणी बेकायदेशीर आहे. त्यामुळे आर टी ई अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांना अशी मागणी करता येणार नाही असे स्पष्ट आदेश द्यावेत अशी मागणी संदिप देसाई यांनी लोहार यांच्याकडे केली.
यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, दिलीप पाटील, राज कोरगावकर, बसवराज हदीमनी, रविराज पाटील व मोठ्या प्रमाणांत पालक उपस्थित होते.