पाटगाव प्रकल्पाचे पाणी अदानींच्या प्रकल्पाला दिल्यास जलसमाधी घेऊ ,शेतकऱ्यांचा इशारा , पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले निवेदन

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पाटगाव प्रकल्पातील पाण्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंजीवडे ता. कुडाळ येथे अदानी कंपनीचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प प्रस्तावित आहे. पाण्यावरील वीज निर्मितीच्या मेगा प्रकल्पासाठी पाटगाव प्रकल्पातून मोठ्या पाईपमधून पाणी नेले जाणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाचे पाणी या प्रकल्पाला दिल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा अनफ खुर्दच्या पाळ्याचा हुडा ता. भुदरगड येथील अशोक मारुती सुतार व शेतकऱ्यांनी दिला. त्यांनी याबाबतचे निवेदन भेटून मंत्री श्री. मुश्रीफ यांना दिले.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांना श्री. सुतार यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे, पाटगाव धरणाच्या पाण्यावर अदानी यांचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प प्रस्तावित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंजिवडे गावी होणाऱ्या या प्रकल्पासाठी मोठ्या पाईपमधून हे पाणी नेले जाणार आहे. या प्रकल्पातील पाणी भुदरगडसह कागल तालुक्यातील आणि सीमा भागातील जनतेच्या हक्काचे पाणी आहे. माजी आमदार स्वर्गीय कै. हरिभाऊ कडव यांच्या दूरदृष्टीतून आणि अथक प्रयत्नातून हा प्रकल्प बांधला आहे. कडगाव प्रकल्पामुळेच वेदगंगा नदी बारमाही वाहते. त्यावर हजारो एकर जमीन अवलंबून आहे. हे पाणी प्रकल्पाला दिल्यास हजारो एकर जमीन बिनपाण्याची ओसाड पडून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. शेतकऱ्यांच्या हक्काचे एक थेंबही पाणी सिंधुदुर्गात न जाऊ देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आपण विशेष प्रयत्न करावेत.
अधिकाऱ्यांची कमालीची गुप्तता……. !
याबाबत श्री. अशोक सुतार म्हणाले, या प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती मी माहितीच्या अधिकाराखाली गोळा केली आहे. या प्रकल्पाला परवानग्या देताना, वन विभागाच्या सर्वेला परवानगी देताना आणि इतर सर्व कागदपत्रांबाबत अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.