स्वाभिमानीचे आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन ; ऊसदराचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पेटणार

मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
ते म्हणाले की, १३ सप्टेंबरपासून ऊसदरासाठी आमचे आंदोलन सुरू आहे. दि. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली. तसेच ७ ते १५ नोव्हेंबरपर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ऊसदरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. तरीही ऊसदराचा प्रश्न निकाली निघालेला नाही. आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे हे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
राजू शेट्टी हे स्वतः हातकणंगले येथे रस्त्यावर उतरणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते, मुरगुड ,सिद्धनेली आदी ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यासह संपूर्ण ऊसपट्ट्यात चक्काजाम आंदोलन होणार आहे.