मोठी बातमी : राज्यातील मुंबई, पालघर ,रायगडसह अनेक जिल्ह्यांना उद्या ‘रेड’ अलर्ट

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. पालघर, रायगड या जिल्ह्यांना देखील यापूर्वी रेड अलर्ट देण्यात आला होता. दरम्यान, आज दुपारच्या बुलेटिनमध्ये भारतीय हवामान विभाग मुंबईने दिलेल्या माहितीनुसार पालघर, रायगडसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवार, २१ जुलै राेजीही पश्चिम घाटमाथ्यावरील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती IMD मुंबईने ट्विटरवरून दिली आहे.
‘आयएमडी’ मुंबईने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आज (२० जुलै) पालघर, ठाणे, रायगड, पुणे या जिल्ह्यांना तर उद्या (२१ जुलै) पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्टचा अंदाज आहे. दरम्यान, २४ जुलैपर्यंत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.