केडीसीसी बँकेत मृत शेतकर्यांच्या वारसांना विमा धनादेशांचे वाटप ; अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते १६ लाखांच्या धनादेशाचे वाटप

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अपघाताने मृत आठ शेतकऱ्यांच्या वारसदारांना केडीसीसी बँकेत विमा रक्कमेच्या धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बैठकीत हे वितरण झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, बँकेने किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत स्वभांडवलामधून पीक कर्ज घेणाऱ्या अडीच लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा उतरविला होता. तसेच; बँकेने सन २०२५-२६ सालाकरिता न्यू इंडिया एशोरन्स कंपनी अंतर्गत ईमेड लाईफ इन्शुरन्स ब्रोकिंग सर्विसेस- पुणे या कंपनीच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्डधारक अडीच लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख विमासुरक्षेचा विमा उतरविला आहे. विमा हप्त्याची तोशिस शेतकऱ्यांना लागू न देता बॅंकेने विमा हप्त्याची एक कोटींची ही रक्कम नफ्यातून भरली आहे. आत्तापर्यंत मृत शेतकर्यांच्या वारसांना पाच कोटीहून अधिक विमा रक्कम मिळाली आहे.
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा केडीसीसी बँकेचा आत्मा आहे. शेतातील कामे करताना सर्पदंश, विजेचा धक्का, औषध फवारणी, जनावरांचे हल्ले अशा विविध कारणांमुळे तसेच अपघाताने शेतकऱ्यांचे दुर्दैवी मृत्यू होतात. अशा संकटग्रस्त परिस्थितीत त्यांच्या संकटग्रस्त कुटुंबाला हातभार लागावा म्हणून बँकेने प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपये विमासुरक्षेची योजना सुरु केली आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीत विठ्ठल हरी मगदूम- निढोरी, शिवाजी नाना पाटील- तारळे खुर्द, शिवाजी पांडुरंग अतिग्रे- लाटवडे, महेशकुमार देवगोंडा वंटे- गणेशवाडी, वसंत नाना पाटील- कसबा तारळे, सर्जेराव चंद्रकांत जांभीलकर- महाडिकवाडी, साऊबाई मारुती दंडवते- गोरंबे, बाळासाहेब बापू चौगुले- दारवाड या मृतांच्या वारसदारांना धनादेश देण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, राजेश पाटील, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व इम्तिहाज मुन्शी आदी प्रमुख उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.