कोटा, पुणेच्या धर्तीवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कागलमध्ये तयार करू : मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही कागलमध्ये दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राजस्थानमधील कोटा व पुण्याच्या धर्तीवर यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन केंद्र कागलमध्ये निर्माण करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न साकारेल, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने व माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांच्या पुढाकाराने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. मंत्री श्री. मुश्रीफ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व बक्षीस वितरणही झाले. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून आपले करिअर करावे. प्रवेशासाठी जी मदत लागेल ती करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांनी टाळावा. शिक्षणापुरता मोबाईलचा वापर करावा. पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच; आई- वडिलांचा धाक गरजेचा आहे .
माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले दहावी-बारावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांना योग्य दिशा देणे व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे . विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात आता होत आहे . शासन शिक्षणासाठी मदत करत आहे . विद्यार्थ्यांनी कष्ट घेऊन मोठे यश संपादित करावे . आपल्या पाल्यांवर आई-वडिलांनी चांगले संस्कार केले पाहिजेत . मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो .
भैय्या माने म्हणाले, शिक्षणामुळेच देशात समृद्धी आले आहे . संघर्षातून आपण तयार होतो . आयुष्यात संघर्ष करायची तयारी ठेवा . कष्टातून यश प्राप्त करा कॉपी करून यशस्वी होता येत नाही . कागल शहरातील अनेक मुले चांगल्या पदावर काम करत आहेत . हे शिक्षणामुळे शक्य झाले आहे . मुलांनी मोबाईलचा अतिवाट वापर टाळणे गरजेचे आहे . अन्यथा व्यसनमुक्ती सारखी मोबाईल मुक्ती केंद्र काढावी लागतील . मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेतृत्व कागलला मिळाले आहे . त्यांनी कागल शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे .
तातडीने कमिटी स्थापन करा….!
श्री. मुश्रीफ म्हणाले, राजस्थानमधील कोटा आणि पुण्यातील कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा जास्त ओढा आहे. तिथे असणाऱ्या सोयीसुविधा आणि त्या कोचिंग क्लासेसची कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी एक कमिटी स्थापन करा. कमिटीने जाऊन या दोन्ही शहरातील कोचिंग क्लासेसचा अभ्यास करून अहवाल सादर करावा. त्यानुसार कागललाही त्या पद्धतीचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन उभारू.
महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे म्हणाल्या, दर्जेदार व गुणवत्त शिक्षण घेऊन आपल्याला व्यवसाय- नोकरी तर करायचीच आहे. त्याच जोडीला एक चांगला माणूस व सुजाण नागरिक बना…..!
प्राचार्य डॉ . संजयकुमार इंगळे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिकणासाठी मार्गदर्शन केले. तसेच; उदय काटकर यांचीही मनोगत झाले.
यावेळी कागल शहरातील रहिवाशी व दृष्टीदोष असलेल्या शिवम चौगुले यांनी आयआयटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्याबद्दल आणि पीएच. डी. करीत असल्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार झाला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, रामगोंड पाटील, अतुल जोशी, शुभम चौगुले, नवल बोते, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ. शितल फराकटे, पी. बी . घाटगे, नामदेवराव पाटील, प्रविण काळबर, ॲड . संग्राम गुरव, नितीन दिंडे, अस्लम मुजावर आदी उपस्थित होते .