शत्रूचे सुद्धा वाईट चिंतू नका, चांगले काम करीत राहा ; वाईट करणाऱ्याचे वाईटच होते व चांगले करणाऱ्याचे चांगलेच होते ; मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन, मळगे बुद्रुक येथे विविध सत्कार व विकासकामांचे लोकार्पण

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
जो वाईट चिंततो आणि वाईट करतो त्याचे वाईटच होते. शत्रूचेसुद्धा वाईट चिंतू नका. चांगले काम करीत रहा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे वाईट चिंतणा-यांची परमेश्वराने किती दयनीय अवस्था करून ठेवली आहे हे तुम्ही पहातच आहात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
मळगे बुद्रुक ता. कागल येथे विविध सत्कार समारंभ आणि विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विधानसभेतील विजयाबद्दल व मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार ग्रामस्थांच्यावतीने झाला. तसेच; मळगे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती शांतादेवी पाटील व उपसरपंच श्री. एकनाथ वायदंडे यांचा मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक सगळ्या अर्थानेच आगळी-वेगळी होती. विरोधक कुठलीही गोष्ट करायची शिल्लक ठेवायची नाही, हे ठरवूनच कामाला लागले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यापासून “मी पुन्हा निवडणूक लढविणार,” “मी हसन मुश्रीफांचा पराभव करणार,” “मी शाश्वत विकास करणार” असे सांगत ते मतदारांसमोर आले होते. त्यातूनच मला अटक करायची, माझ्या कुटुंबीयांना ई. डी. च्या फेऱ्यांमध्ये अडकवायचं, त्यांना त्रास द्यायचा, तरुणांची माथी भडकवायची असली कटकारस्थाने रचली. तसेच; कार्यकर्त्यांना उलट करण्यासाठीही पैसे दिले गेले आणि गप्प बसण्यासाठीही पैसे दिले. परंतु; मी मात्र कधीही त्यांचे वाईट चिंतले नाही. व्यक्तिगतरीत्या कधीही त्यांच्या वाटेला गेलो नाही.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितलताई फराकटे यांचीही मनोगते झाली.
व्यासपीठावर बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, बिद्री कारखान्याचे संचालक पैलवान रवींद्र पाटील, रावसो खिल्लारी, माजी पंचायत समिती उपसभापती आनंदराव अस्वले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष निलेश शिंदे, पिंपळगाव बुद्रुकचे सरपंच बंडेराव सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर अस्वले, सतीश पाटील, वैशाली कांबळे, सुनीता परबकर, सविता कळमकर, श्रीकांत पाटील, एकनाथ पाटील, प्रताप पाटील, प्रा.टी.एम.पाटील, विश्वंभर हवालदार, हणमंतराव पाटील, रघुनाथ अस्वले, प्रमोद अस्वले, उत्तम पाटील, किशोर पाटील, भगवान अस्वले, पिराजी कांबळे, दत्तात्रय तिराळे, विलास परबकर, बाळासो पाटील, नंदकुमार पाटील, युवराज साळसकर, निवास परबकर, दिनेश कांबळे, उत्तम पाटील, निवृत्ती चौगले, आप्पासो डोणे, मनोज पाटील, हर्षवर्धन पाटील, शिवाजी साळसकर, शिवाजी हवालदार, महादेव दाभोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वागत प्रताप पाटील यांनी केले. प्रास्ताविक भगवान अस्वले यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार हर्षवर्धन पाटील यांनी मानले.
माझा जिवापाड सांभाळ……..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, लोकांच्या समस्या व अडीअडचणी या माझ्या समस्या आहेत. जनतेचे सुख- दुःख हे माझे सुख दुःख आहे, या भावनेनेच काम करीत आलो. म्हणूनच 35 -40 जनतेनेही माझा जिवापाड सांभाळ केला आहे.