उचंगी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न समन्वयाने सोडवूया : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन; प्रकल्पग्रस्त व प्रशासनाची जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त आढावा बैठक

कोल्हापूर :
उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समन्वयाने सोडवूया, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होऊन यावर्षी घळभरणी होऊन, पाणी अडविले जावे, ही पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची भावना आहे, असे ते म्हणाले.
उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या व प्रशासनातील अधिकारी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे आदी अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होऊन यावर्षी घरभरणी व्हावी, ही सरकारची आणि शेतकऱ्यांचीही अपेक्षा आहे. पुनर्वसना संबंधी असलेल्या समस्या निकालात काढूच. दरम्यान घरभरणीसाठी शेतकऱ्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले. धरणग्रस्तांच्यावतीने धरणग्रस्तांचे नेते कॉम्रेड धनाजीराव गुरव व अशोकराव जाधव यांनी धरणग्रस्तांच्या समस्या मांडल्या. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंब संस्थेची व्याख्या निर्वाह क्षेत्राची व्याख्या आदी बाबत चर्चा झाली.
यावेळी केडीसीसी बँकेचे नूतन संचालक सुधीर देसाई, आजरा पंचायत समितीचे सभापती उदयराज पोवार, माजी सभापती अल्बर्ट डिसोजा, विष्णुपंत केसरकर, जेऊरचे सरपंच मारुती चव्हाण, चाफवडेचे सरपंच विलास धडाम, राजू होलम आदी प्रमुखांसह शेतकरी उपस्थित होते.
आजच चर्चा करून अहवाल द्या. बैठकीत अधिकारी व धरणग्रस्त यांच्यामध्ये कुटुंब संस्थेची व्याख्या, निर्वाह क्षेत्र पॅकेज, मोबदला पॅकेज, जमीन हस्तांतरण अशा मुद्यांवर मतभेद होते. मंत्री श्री.मुश्रीफ यांनी अधिकारी व प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याने एकत्र बसून अशा मुद्द्यांवर चर्चा करून आजच्या आज अहवाल द्या, अशा सूचना केल्या.