“जर त्यांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला उदयनराजेच जबाबदार असतील”

मुंबई
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनच्या विरोधात हाती कटोरा घेऊन भिक मागो आंदोलन केलं. साताऱ्याच्या रस्त्यावर फिरुन आणि फुटपाथवर बसून त्यांनी भिक मागत सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. उदयनराजेंच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
उदयनराजे भोसले राज्यात लॉकडाऊन नको असं म्हणत आहेत. पण पुढे चालून लोक मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आले आणि त्यांच्या जिवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला उदयनराजेच जबाबदार असतील, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय.
लोकप्रतिनिधी म्हणून निर्णय घेताना परिस्थितीचं गांभिर्य ओळखून योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. विकेंड लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता कोरोना रुग्णांची आकडेवारी तिप्पट झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी लॉकडाऊन केला नाही तर परिस्थिती बिकट होईल, अशी भीती शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलीय.
दरम्यान, व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.