मंत्री कसा असावा याचे उदाहरण म्हणजे हसन मुश्रीफ तर मंत्री कसा नसावा याचे उदाहरण म्हणजे चंद्रकांत पाटील…..! राष्ट्रवादीची भाजपला सणसणीत चपराक…….! स्वतःच्या गावची साधी ग्रामपंचायत न जिंकता आलेल्या चंद्रकांत पाटलांचा उदो-उदो किती करता ?

कोल्हापूर :
मंत्री कसा असावा याचे उदाहरण म्हणजे हसन मुश्रीफ तर मंत्री कसा नसावा याचे उदाहरण म्हणजे चंद्रकांत पाटील, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांचे जन्मगाव असलेल्या खानापूर ता. भुदरगड येथील साधी ग्रामपंचायतसुद्धा जिंकता आलेली नाही. मग त्यांचा ऊदो- उदो किती करता? असा सवाल राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने असुरक्षित वाटू लागल्यामुळेच त्यांना सुरक्षित असलेल्या पुणे जिल्ह्यातील कोथरुडला जावे लागले, असेही या पत्रकात पुढे म्हटले आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करणारे पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी हे पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. या पत्रकावर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रताप उर्फ भैय्या माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने -पाटील, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, जिल्हापरिषद सदस्य सतीश पाटील – गिजवणेकर या प्रमुखांच्या सह्या आहेत.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोणताही दुरान्वयेही संबंध नसतानाही जाणीवपूर्वक आमचे नेते शरद पवार यांची बदनामी केली तर ती यापुढे खपवून घेणार नाही. त्याला जशास तसेच प्रत्युत्तर देऊ. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या प्रकृतीची चिंता भाजपवाल्यांनी करू नये. कारण, बाजार- बुणग्यांच्या शिव्याशापाने त्यांना काहीही फरक पडणार नाही. त्यांची प्रकृती राजबिंडीआणि पैलवानकीची आहे. ती गाडग्या- मटक्यासारखी नाही. त्यांचे राजकारण तालुक्याचे आहे, जिल्ह्याचे आहे की राज्याचे आहे, हे कोल्हापूर जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे.
ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या जनसेवेचे आणि विशेषता वैद्यकीय सेवेचे कौतुक दस्तुरखुद्द राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहातही केले आहे.
मंत्री हसन मुश्रीफ आणि गोरगरीब जनतेची नाळ घट्ट जुळलेली आहे. गोरगरीब जनतेबरोबर उभी हयात त्यांनी व्यतीत केलेली आहे. सर्वसामान्य माणसांच्या समस्यांच्या निराकरणासाठी पत्र द्यायला सुद्धा याआधी मंत्री आठवडा -आठवडाभर घालवायचे. जनतेला सर्किट हाऊसवर अक्षरशा रेंगाळायला लावायचे, हेही जनतेला चांगलेच माहित आहे. त्यामुळे, मंत्री कसा असावा याचे उदाहरण म्हणजे हसन मुश्रीफ तर मंत्री कसा नसावा याचे उदाहरण म्हणजे चंद्रकांत पाटील, अशी टीकाही केली आहे.
अहमदनगर पालकमंत्री पदाच्या टीकेला उत्तर देताना पत्रकात म्हटले आहे, पालकमंत्री या नात्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत व्यवस्थितपणे हाताळली आहे. त्यामुळे तेथील लोकप्रतिनिधींसह जनताही त्यांच्यावर खुश आहे.
आधी या प्रश्नांची उत्तरे द्या…….!
पत्रकात म्हटले आहे, चंद्रकांत पाटील यांनी आमचे नेते शरद पवार यांची विनाकारण बदनामी केली होती. त्या अनुषंगाने मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या मुद्द्यांना आधी उत्तरे द्या, ते मुद्दे असे…….
कोल्हापूर जिल्ह्यातून उमेदवारी करणे असुरक्षित वाटल्यामुळेच चंद्रकांत पाटील यांना पुण्याला सुरक्षित जागी जावे लागले. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. जिल्हा परिषदेसह महापालिका व कोणत्याच महत्त्वाच्या संस्थेवर भाजपची सत्ता राहिलेली नाही. जवळच्याच सांगली जिल्ह्यात सगळ्या सत्ता राष्ट्रवादी काढून घेत आहे.