ताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवा – आमदार हसन मुश्रीफ ; हसन मुश्रीफांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गैर नियोजनामुळेच शेतकऱ्यांचे हजारो एकरातील ऊसपिक अक्षरशः करपत चालले आहे, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाटबंधारे प्रकल्पांच्या गळती काढण्याचे कोणतेही नियोजन नसताना, काहीही पूर्वतयारी नसताना सात टीएमसीहून अधिक पाणी कशासाठी सोडलात? असा रोखठोक सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

या बैठकीत आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी तातडीने सोडवण्याच्या सूचनाही श्री.मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समवेत झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पाणी मिळत नसून, कर्नाटकला मात्र पाणी मुबलक मिळत असल्याच्या जोरदार तक्रारी केल्या. यावर आमदार मुश्रीफ यांनी प्रकल्पांमधील पाणी का संपवले? असा जाब अधिकाऱ्यांना विचारला. बैठकीत आंबेओहोळच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनीही त्यांच्या अडचणी मांडल्या. आंबेओहोळ प्रकल्पाची घळभरणी झाल्यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता आहे. त्यामुळेच प्रकल्पग्रस्तांची कामे रखडत आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

आंबेओहळ प्रकल्पातील पाणी नियोजन योग्यरीत्या करून शेतकऱ्यांना पाणी वाटपासाठी प्राधान्य द्या. जमीन न मिळालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने जाहीरनामा काढून जमीन व प्लॉट वाटप करा, अशा सूचना आमदार मुश्रीफ यांनी दिल्या. २८ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे संकलन दुरुस्तीचे प्रस्ताव रिव्हीजनसाठी पुण्यात आयुक्तालयात पाठविले आहेत. ते तातडीने निकालात काढा, अशी मागणी केली. त्यासाठी उपायुक्त सुधीर जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. परंतु, संपर्क झाला नाही.

यापूर्वी स्वेच्छा पुनर्वसन घेतलेल्या ३५५ शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळालेले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करू आणि उच्च न्यायालयात पुन्हा दाद मागून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू. तसेच; करपेवाडी येथील सदोष स्वेच्छा निवाडा रद्द करण्यासाठीही उच्च न्यायालयात दाद मागून न्याय मिळवू, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या प्रकल्पातील पाणी कर्नाटकाच्या सोयीसाठी सोडल्याचा थेट आरोप केला. इकडे उपसाबंदी आणि तिकडे मात्र लोंढा सुरू आहे, असे वर्णन शेतकऱ्यांनी सांगताच मुश्रीफ संतप्त झाले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जलसंपदा दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. स्मिता माने, जलसंपदा उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सौ. सविता लष्करे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, भूसंपादनचे उप जिल्हाधिकारी शक्ती कदम, जलसंपदाचे उपविभाग्य अभियंता दिनेश खट्टे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी पंचायत समिती सभापती शिरीष देसाई, महादेवराव पाटील, संजय येजरे, विजय वांगणेकर, मच्छिंद्र कडगावकर, सचिन पावले, अमृत पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks