बोरवडेत होळी लहान, शेणी दान उपक्रम यशस्वी, प्राथमिक शाळेच्या बालचमूंचा अनोखा उपक्रम, सुमारे दोन हजार शेणी केल्या दान
बिद्री ( प्रतिनिधी/ अक्षय घोडके) :
होळी म्हणजे आपल्यातील दुःख, दारिद्रय, निराशा, आळस या सर्वांचे दहन करणे होय. होळीच्या दिवशी ग्रामीण भागात लहान मुले घरोघरी जावून गोवऱ्या अर्थात शेणी जमा करतात. सायंकाळी जमा केलेल्या सर्व शेणी एकत्र रचून त्या जाळल्या जातात. त्यामुळे या शेणी निरुपयोगी तर ठरतातच शिवाय, त्यामुळे वायू प्रदुषणही होते.
या सर्व दुष्परिणामांचा विचार करुन, बोरवडे ( ता. कागल ) येथील लहानग्यांनी ही होळी अनोख्या पद्धतीने साजरी केली. विद्या मंदीर या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी होळीसाठी जमा केलेल्या सुमारे दोन हजार शेणी गरीब व गरजूंना दान करुन आगळा वेगळा आदर्श घालून दिला. पर्यावरणपुरक पद्धतीने साजऱ्या झालेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज. रा. पाटील, रेखा चव्हाण, कावेरी चव्हाण, सविता पाटील, कल्पना कुदळे, बेबीताई कदम, लक्ष्मी खाडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.