तरुणांच्या पंखांना बळ देण्यासाठी शाहू ग्रुप सदैव कटिबद्ध : समरजितसिंह घाटगे ; सानिका स्पोर्टस फाऊंडेशनमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप व सत्कार समारंभ

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशा तरुणांच्या पंखात बळ भरण्यासाठी शाहू ग्रुप सदैव कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले
शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७४व्या जयंतीनिमित्त सानिका स्पोर्टस फाऊंडेशनमार्फत आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप व सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील होते.यावेळी गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.
यावेळी कोजिमाशिचे नूतन संचालक बाळ डेळेकर,पत्रकार अविनाश चौगुले यांच्यासह निशांत जाधव,विजय गोधडे आदींचा सत्कार केला.
श्री घाटगे पुढे म्हणाले,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहनाची गरज आहे. परप्रांतीयांना बळाच्या जोरावर पर्याय देऊ शकत नाही. त्यासाठी स्थानिक तरुणांनी मेक इन कोल्हापूर सारख्या संकल्पनातून व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत.
अध्यक्षीय मनोगतात गोकुळची माजी चेअरमन रणजितसिंह पाटील म्हणाले, आपल्या वैयक्तिक व सामाजिक प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मुलांवर सामाजिक बांधिलकीचे संस्कार शालेय वयातच करणे आवश्यक आहे. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनचा गरीब -होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे.
यावेळी मुरगुड विद्यालयाचे प्राचार्य एस.आर.पाटील,कोजिमाशिचे संचालक बाळ डेळेकर,पत्रकार अविनाश चौगले,यांनीही मनोगते व्यक्त केली.
व्यासपिठावर शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस, दत्तामामा खराडे ,विलास गुरव बजरंग सोनुले,विश्वजीत पाटील,अमर चौगुले,दिगंबर अस्वले,प्रवीण चौगुले,दत्तामामा जाधव,संजय चौगुले आदी उपस्थित होते.
स्वागत फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत मांगोरे यांनी केले.प्रास्तविक दगडू शेणवी यांनी केले.निशांत जाधव यांनी आभार मानले.
त्यांनी स्व.राजेंचा संस्कार जोपासला…!
सहकारमहर्षी स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांचा हाच संस्कार सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सत्कारातून जोपासला आहे. असे गौरवोद्गार श्री. घाटगे यांनी यावेळी काढले.