कागल : राष्ट्रीय पातळीवरील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्काराचा मानकरी ;६६ व्या पुरस्काराने शाहूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को अॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांचा वसंतदादा पाटील यांच्या नावाने दिला जाणारा देशातील ” सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना “हा मानाचा पुरस्कार हंगाम 2021-22 साठी येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास मिळाला आहे. हंगाम 2018-19 मध्ये “शाहू ” या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
शाहू साखर कारखान्यास राष्ट्रीय व राज्यपातळीवर आजअखेर एकूण ६६ पुरस्कार मिळाले आहेत.यामध्ये ६ पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून आहेत.या ६६ व्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे समारंभपुर्वक कारखान्यास प्रदान करण्यात येणार आहे.
दिल्ली येथील राष्ट्रीय साखर महासंघाचे पुरस्कार मिळाल्याचे पत्र प्राप्त होताच संचालक, सभासद शेतकरी,अधिकारी-कर्मचारी, व हितचिंतक यांनी गैबी चौक,खर्डेकर चौक, श्रीराम मंदिर,कारखाना कार्यस्थळावर तसेच गावोगावी फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.
कारखाना प्रांगणातील आराध्य दैवत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
हा पुरस्कार शाहू महाराज व सभासद शेतकऱ्यांना अर्पण – राजे समरजितसिंह घाटगे…….
याबाबत प्रतिक्रिया देताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कारखान्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हिताच्या कृतीचा वारसा, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखाना चालवणेसाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे ,तसेच कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांचे मार्गदर्शन ,सभासद , शेतकऱ्यांनी विश्वासाने व प्रामाणिकपणाने दिलेली साथ, व्यवस्थापनाचे नियोजनास अधिकारी-कर्मचारी यांच्या कष्टाची जोड, याचे हे फलित आहे.
स्व. राजेसाहेब यांनी छत्रपती शाहू महाराज याना आदर्श मानून हा कारखाना चालवला. त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षात कारखान्याचा झालेला हा गौरव म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून त्यांना अभिवादन केले आहे……
हा तर शाहूच्या सभासद-शेतकऱ्यांसह सर्वच घटकांचा सन्मान – श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे…….
यावेळी प्रतिक्रिया देताना शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या , कारखान्याला हा मिळालेला पुरस्कार म्हणजे कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखान्याचे विश्वस्त म्हणून भुमिका बजावताना घालून दिलेली तत्त्वे व त्याला कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणाने दिलेली साथ तसेच व्यवस्थापनाचे नियोजनास अधिकारी-कर्मचारी पुरवठादार यांच्या कष्टाची जोड यामुळे हे शक्य झाले आहे. कारखान्याचा राष्ट्रीय पातळीवर झालेला सन्मान हा शाहूच्या सभासद-शेतकऱ्यांसह सर्वच घटकांचा सन्मान आहे.