सोनाळीत तणावपूर्ण शांतता, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांची गावास भेट, मोठ्या पोलिस बंदोबस्ताने गावाला छावणीचे स्वरुप

बिद्री प्रतिनिधी :
सोनाळी ( ता. कागल ) येथे मंगळवारी रात्री झालेल्या मारामारीनंतर रात्री पासूनच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने गावाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. दरम्यान आज जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांची शांतता बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
सोनाळीतील वरद रविंद्र पाटील या सातवर्षीय बालकाचा ऑगस्ट २०२१ मध्ये संशयित आरोपी दत्तात्रय तुकाराम वैद्य यांने खुन केला होता. घटनेपासून आरोपीचे कुटूंबिय गावाबाहेर होते. सोमवारी आरोपीची पत्नी, भाऊ, भावजय, पुतण्या हे सोनाळीत आले होते. त्यांना गावात घेऊ नये या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी रात्री आरोपीच्या घरावर मोर्चा काढला होता.
या मोर्चावेळी झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. तर पाच ग्रामस्थही जखमी झाले होते. यातील सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. पाटील कुटूंबातील जखमी लोकांनी आपल्याला संशयित आरोपी वैद्य कुटूंबियांनी मारहाण केल्याची फिर्याद मुरगूड पोलिसांत दिली.
पोलिसांनी याबाबत गावातील पाच ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान गावात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. यामुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरुप आले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.