जल जीवन मिशन कार्यक्रमाचे चित्ररथातून होणार प्रबोधन : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते चित्ररथाचे उद्घाटन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना सन 2024 पर्यंत दरडोई 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 90 दिवसाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अध्यक्ष श्री. पाटील यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, महिला व बालकल्याण विभाग सभापती शिवानी भोसले, समाजकल्याण विभाग सभापती कोमल मिसाळ, सदस्य शिवाजी मोरे, स्वरूपाराणी जाधव तसेच अतिरिथ्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा.पं.अरूण जाधव, जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) तसेच माझी वसुंधरा या विषयाबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी चित्ररथ फिरवून जनजागृती केली जाणार आहे.