कोल्हापूर : राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून अडकला, नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग, दक्षतेचा इशारा
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत. नदीतील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

राधानगरी :
आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम सुरु असताना दरवाजा १८ फूट पूर्ण उघडून अडकला. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत. नदीतील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदी काठावरील गावे, नदीवर जनावरे, धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित पाणी सोडण्याची व्यवस्था आणि पाण्याच्या दबावावर उघड-झाप होणार्या स्वयंचलित दरवाजांचे वैशिष्ट्य असणारे राधानगरी धरण देशातील अजोड आणि एकमेव आहे. कोल्हापूर शहरापासून ३५ मैल अंतरावर राधानगरी गावाच्या पुढे भोगावती नदीचा प्रवाह अडवून हे अद्भुत धरण बांधले आहे.