बांधकाम कामगारांसह कुंटुंबियांनाही स्थैर्य देण्यासाठी कटिबद्ध : कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही; म्हाकवेत कामगार मेळावा, साहीत्य वाटप.

म्हाकवे :
स्वतः ऊन, वारा, पाऊस झेलत दुसर्याना निवारा निर्माण करण्याचे उदात्त काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसह त्यांच्या कुंटुंबियांना स्थैर्य लाभेल यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असे अभिवचन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. एकही कामगार योजनेपासून वंचित राहू नये, याची कार्यकत्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
म्हाकवे (ता. कागल) येथे बांधकाम कामगार संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ केल्याबद्दल व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांकडून श्री. मुश्रीफ यांचा सत्कार, एनएमएनएस परिक्षेत यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार, शुभम मंगल कार्यालयाचे उद्घाटन, कामगार मयत सानुग्रह अनुदानाचे वाटप, बांधकाम कामगारांना माध्यान्ह योजनेचा शुभारंभ, त्यांना ओळखपत्रांचे व सुरक्षा किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले.
स्वागत स्मिता पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कामगारांना योजनेसह नोंदणीबाबत माहिती दिली. बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रविणसिंह भोसले, बाजार समितीचे माजी सभापती दिनकर कोतेकर, माजी उपसरपंच रमेश पाटील, शिक्षकनेते जी. एस. पाटील, डॉ. विजय चौगुले, जीवन कांबळे, दिलीप कांबळे, संतोष गायकवाड, अमोल कुंभार, हिंदुराव पाटील, एच. एन. पाटील, निवास पाटील, प्रकाश माळी, माजी सरपंच भारत लोहार, शिवाजी सुतार आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन के. आर. पाटील यांनी केले. एस. के. पाटील यांनी आभार मानले.
उत्पन्नाची अट शिथिल करणार…….
अनेक गरिब, निराधार उत्पन्नाच्या जाचक अटीमुळे पात्र असूनही निराधार योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे लवकरच २१ हजार ऐवजी ५० हजार उत्पन्न मर्यादा करणार आहे. तसेच,निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार पेन्शन करणार असल्याचे अभिवचनही श्री. मुश्रीफ यांनी दिले.