विद्यार्थ्यांनी आवडीनुसार करिअर निवडावे- राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
“दहावी व बारावीनंतर केवळ परंपरेनुसार नव्हे, तर स्वतःच्या आवडी, कौशल्ये आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडावे,” असे स्पष्ट मत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.
कागल येथील शाहू कॉलनीतील सदाशिवराव मंडलिक सभागृहात सामाजिक कार्यकर्ते गजानन माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात घाटगे बोलत होते.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना योग्य नियोजन, चिकाटी व जिद्द यामुळे कोणतेही क्षेत्र यशाचे दरवाजे उघडू शकते,असा कानमंत्र दिला.विविध व्यावसायिक, तांत्रिक, कला, क्रीडा आणि उद्योजकीय क्षेत्रातील संधींचा उल्लेख करत करिअरविषयी मार्गदर्शनही केले. “पालकांनी देखील मुलांवर करिअर निवडीसाठी दबाव न टाकता, त्यांना समजून घेणे आणि योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे,असे स्पष्ट केले.
यावेळी जयवंत रावण,गजानन माने,अमित कोरवी व प्रतिक कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. राजे बँकेचे संचालक अरुण गुरव,प्रवीण कुराडे,सचिन निंबाळकर,सात्तापा घाटगे,दिलीप गाडीवड्ड यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजे बँकेचे संचालक सुशांत कालेकर यांनी स्वागत केले,बाळ मकवाने यांनी आभार मानले.