Sanjay Raut: संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलं पत्र; ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाची प्रतही पाठवली; म्हणाले…

मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. या पुस्तकात त्यांनी तुरुंगातील अनुभव, राजकीय घडामोडी आणि इतर राजकीय गोष्टींबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. संजय राऊत यांनी, या पुस्तकाची एक प्रत राज ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास पाठवली आहे, अशी माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना हे पुस्तक पाठवताना राऊत यांनी पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर, ईडीचे राजकारण आणि शिवसेनेतील फूट यावर अप्रत्यक्षपणे त्यांनी या पुस्तकातून निशाणा साधला आहे. सध्या हे पुस्तक महाराष्ट्रभर चर्चेत आहे.
पत्रात काय म्हणाले संजय राऊत?
श्री. एकनाथ शिंदे,
जय महाराष्ट्र!
‘नरकातील स्वर्ग’ या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले.
श्री. जावेद अख्तर, श्री. शरद पवार, श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. जुलमी व लोकशाही न मानणाऱ्या सरकारने मला एका खोट्या प्रकरणात 100 दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार अमानुष होता. ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून, संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो. या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो हे या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल !कळावे,
आपला नम्र,
(संजय राऊत)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचं ‘नरकातला स्वर्ग’ (Sanjay Raut Book Narkatla Swarg) या पुस्तकाचं प्रकाशन 17 मे रोजी झालं आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी 100 दिवस आर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकात संजय राऊतांनी आजवर त्यांनी आधी नं मांडलेल्या अनेक खळबळजनक बाबी लिहिल्या आहेत.