बिद्री निवडणूकीत तीन माजी आमदारांसह मोरे घराण्याचे के. पी. ना भक्कम पाठबळ

कोल्हापूर प्रतिनिधी :
चार तालुक्यांतील २१८ गावांचा समावेश असलेल्या बिद्री साखर कारखाना निवणुकीचा हाय-व्होल्टेज धमाका सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार के. पी. पाटील यांचे मेहुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी के. पी. यांच्याशी फारकत घेत विरोधी आघाडीला साथ दिली. खास. संजय मंडलिक, आम.प्रकाश आबीटकर, समरजीत घाटगे यांच्या व्युहरचनेला काही अंशी यश आले असले तरी बिद्रीच्या रणसंग्रामात पालकमंत्री हसन मुश्रीफ व आम. सतेज पाटील यांचे पाठबळ के. पी. च्या सत्तारूढ आघाडीला राहिले आहे.
बिद्रीच्या या महासंग्रामात सत्तारूढ आघाडीकडे दीर्घकाळ बिद्रीचे चेअरमन अशी ओळख राहिलेले माजी आमदार दिनकरराव जाधव,राधानगरी भुदरगडचे माजी आमदार बजरंगअण्णा देसाई, कागलचे माजी आमदार संजयबाबा घाटगे व सरवडे येथील बिद्रीचे माजी व्हा. चेअरमन कै. विजयसिंह मोरे यांच्या गटाची ताकद बिद्रीचे चेअरमन के पी पाटील यांच्याशी राहिल्याने बिद्रीत श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीला बळ देणारे ठरले आहे.
ए. वाय. पाटील यांनी बिद्रीच्या चेअरमनपदाची घातलेली अट डावलली म्हणून विरोधी आघाडीची साथ संगत केली आहे. चेअरमन के. पी. पाटील हे बिद्रीचा कारभार गेले १९ वर्षे सक्षमपणे सांभाळत असताना ए. वाय. यांची चेअरमन पदाची मागणी रास्त कशी ? याबद्दल कार्यक्षेत्रात चर्चा होताना दिसत आहे.
बिद्रीच्या गत निवडणुकीत सत्ताधारी असलेले ए वाय पाटील, शाहूचे चेअरमन समरजीत घाटगे, बिद्रीचे माजी व्हा.चेअरमन बाबासाहेब पाटील आदी मंडळी आज खासदार मंडलिक,आम आबीटकर यांच्याबरोबर जरी गेली असले तरी बिद्री कार्यक्षेत्रातील हे तीन वजनदार माजी आमदार व सरवडे येथील मोरे घराणे सत्तारूढ आघाडीतून हरकत घेऊन गेलेल्या नेत्यांची मोकळीक बिद्रीत भरून काढतील अशी चर्चा जोर धरून आहे.एकूणच बिद्रीत के पी ना मिळालेले पाठबळ राजकीय ताकद सिद्ध करणारे ठरले आहे.