शिक्षकांनो…… शाळा ही मंदिरे आहेत संघटितपणे काम करा : शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे आवाहन ; नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिक्षकानो शाळा ही ज्ञानाची पवित्र मंदिरे आहेत. संघटितपणे काम करा आणि ज्ञानाधिष्ठित पिढ्या निर्माण करा, असे आवाहन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनचे सर्वच उपक्रम समाजोपयोगी आणि विधायक आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
कागलमध्ये नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, आमदार जयंत आसगांवकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार काळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज, गोपाळकृष्ण गोखले, वसंतदादा पाटील यांचे पाय या भूमीला लागले आहेत. त्यामुळे या भूमीला वेगळे महत्व आहे . त्यामुळेच कागल तालुका शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेत पहिला आला आहे. गोरगरीब कष्टकरी माणूस केंद्रबिंदू मानून मंत्री हसन मुश्रीफ हे काम करीत आहेत . हजारो शस्त्रक्रिया त्यांनी मोफत करून आणल्या आहेत. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो . शिक्षकांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समायोजनाची प्रक्रिया सोपी नाही . बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, अशी परिस्थिती झाली आहे. शाळा कोणालाही दिली जाणार नाही . तसेच कंत्राटी शिक्षक भरतीचा जी. आर. ही रद्द करण्यात आला आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांची जबाबदारी आता वाढली आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गळती व शिक्षकांचे समायोजन ही मोठी समस्या आहे . यामुळे शिक्षकांनी चांगले ज्ञान विकसित करण्याची गरज आहे. परमेश्वराने शिक्षकांना ज्ञानदानाची फार मोठी संधी दिली आहे . पालक आपल्या पाल्यासाठी खर्च करायला तयार आहेत . शिक्षकांची जुनी पेन्शनची मागणी आहे . त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्याचा आपण प्रयत्न करू. शिक्षणात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे . मोबाईलच्या अतिवापरामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुश्रीफ फाउंडेशनने घेतली आहे. तसेच महापूर, आपत्ती, गणराया अवॉर्ड गोरगरिबांना अन्नधान्य यासह विविध नोकऱ्यांसाठीचे प्रशिक्षण वर्ग, असे अनेक सामाजिक उपक्रम फाउंडेशनने राबवले आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला . स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व वाय. माने ( आण्णा) यांनी शिक्षण संस्था उभारल्या . मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शिक्षण संस्था काढून दिल्या . तालुक्याचा शिक्षणाचा आलेख असाच चढता ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून संस्कारासह पिढी घडवणे शिक्षकांचे काम आहे . मंत्री मुश्रीफ यांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे.
आमदार जयंत आसगांवकर यांनीही मनोगत व्यक्त केले . स्वागत शंकर संकपाळ यांनी केले प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले.
कार्यक्रमास शिक्षक नेते दादासाहेब लाड, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, वसंतराव धुरे, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, विकास पाटील, दिनकर कोतेकर, बाळासो तुरंबे, पैलवान रवींद्र पाटील, सुनिल माळी, जयदीप पोवार यांच्यासह राष्ट्रवादी शिक्षक सेलचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.