‘राखी’ रुसली : रक्षाबंधन दिवशीच चिमुकल्या भावाचा मृत्यू , राधानगरी तालुक्यातील दुर्दैवी घटना

रक्षाबंधना दिवशीच चिमुकल्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन वर्षीय आरोहन संदिप घारे असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना राधानगरी तालुक्यातील तिटवे येथे घडली. या घटनेने घारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आरोहनला मृत्यूने चोरपावलांनी अचानक गाठलं आणि छोट्या बहिनींचे त्याच्या हाती राखी बांधण्याचे स्वप्न अपुरेच राहिले.
घारे कुटूंबात ‘आरोही’ व ‘ओवी’ या दोन कन्येच्या पाठीवर दोन वर्षापूर्वी ‘आरोहन’ या चिमुकल्याचा जन्म झाला. अचानकच ‘आरोहन’ला शारीरिक त्रास सुरु झाला. वैद्य हाकीम झाले, शेवटी एका बालरोगतज्ञाला निदान लागले आणि समजले की मुलांला ‘ब्रेन ट्युमर’ झाला आहे. या कष्टकरी कुटूंबानं बाळाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गेल्या २२ एप्रिल रोजी त्याची ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया केली. पण त्यामध्ये दुर्दैवाने त्याची दृष्टी गेली. गेली चार महिने तो फक्त आवाजावरून माणसं ओळखत होता. पण मंगळवारी अचानक त्याला जास्त अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला भोगावती येथील बालरोग तज्ञाकडे दाखल केले.
“बहिणींचा भावाला बघण्यासाठी आग्रह”
यावेळी घरी असलेल्या दोन लहान बहिणींनी भावाला दवाखान्यात बघण्यासाठी नेण्याचा वडीलांकडे आग्रह धरला. तेंव्हा वडीलांना मुलींना समजावत सांगितले, उद्या रक्षाबंधन आहे, मी भैयाला सकाळी घरी घेवून येतो. तुम्ही त्याला राखी बांधून त्याचे औक्षण करा. मुलींनी वडिलांचे म्हणणे ऐकून दवाखान्यात जाण्याचा हट्ट सोडला.
“अचानक आरोहनची तब्बेत बिघडली अन् प्राणज्योत मालवली”
मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेचे होते. रात्री चिमुकल्या आरोहनची तब्बेत अचानक बिघडली आणि पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. घरी रक्षाबंधनासाठी वाट पहात बसलेल्या बहिनींना भावाच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्याची दुर्दैवी वेळ आली. यावेळी आई- वडील व कुटुंबियांनी फोडलेला टाहो सर्वांची हृदय पिळवटून टाकणारा होता. आज तिटवे गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.