अंतिम मुदत संपली ; आता ITR भरण्यासाठी आकारला जाईल 5000 रुपये दंड

आयकर रिटर्न (ITR) भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील केंद्र सरकारने मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे आता यापुढे आयटीआर भरणाऱ्या करदात्यांना दंड भरावा लागणार आहे. यावेळी आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्यासाठी करदात्यांना 31 जुलैपर्यंत मुदत दिली होती.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 6 कोटींहून अधिक लोकांनी वेळेवर आयटीआर भरला आहे. 30 जुलै रोजी 27 लाखांहून अधिक रिटर्न भरले गेले.
इतका दंड भरावा लागेल
आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, जर तुम्ही आयकर विभागाच्या कलम 139(1) अंतर्गत अंतिम मुदतीत ITR दाखल केला नाही, तर तुम्हाला कलम 234F अंतर्गत दंड म्हणून 5,000 रुपये विलंब शुल्क आकारला जाऊ शकतो. जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला फक्त 1000 रुपये दंड भरावा लागेल.
आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, कर न भरल्यास दंड, व्याज किंवा त्या व्यक्तीविरोधात खटला दाखल होऊ शकतो. या अंतर्गत 3 महिने ते 2 वर्षांपर्यंत तुरुंगवासची तरतूद आहे. मात्र, जर कर चुकवलेली रक्कम 25,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर 6 महिने ते 7 वर्षे तुरुंगवासही होऊ शकतो.